शेतकऱ्यांवर कोसळले आभाळ, चिखलात लोळून आली धाय मोकलून रडायची वेळ
मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल
औरंगाबाद : सध्या परतीच्या पावसाने अनेक भागांमध्ये अक्षरश: थैमान घातले. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. परिणामी हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. चिखल आणि गाळात लोळून रडणाऱ्या शेतकऱ्यांचे हे विदारक चित्र डोळ्यात अश्रू उभे करणारे आहे.
औरंगाबादमध्ये या शेतकऱ्यांनी मका, सोयाबीेन आणि कपाशीचे पीक घेतले होते. परंतु, कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी मक्याचे पीक घेतले. मात्र, बाजारात त्याला भाव नाही. यानंतर कपाशीचे पीक घ्यायला गेलो तर संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल एका उद्विग्न शेतकऱ्याने विचारला. मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी केली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घातली.