‘केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे’ या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’चे रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत "रात्रभर आत्मक्लेश जागर" - राजू शेट्टी
कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी आज गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत “रात्रभर आत्मक्लेश जागर” आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांच्यावर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत 7 दिवसाxपासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत. त्या शेतकर्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे. रात्री पिठलं भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केले जाणार आहे. ‘केंद्र सरकारला सुबुध्दी दे’ व ‘शेतकऱ्यांना न्याय मिळू दे’ या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असून रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जागर होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.