रूपाली चाकणकर झाल्या भावुक; पतीसाठी केली भावनीक पोस्ट….
रुपाली चाकणकर यांच्या लग्नाला शनिवारी 20 वर्षे पूर्ण
“राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश आध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या लग्नाला काल 20 वर्ष ( शनिवारी ता. 28 ) पुर्ण झाली. मात्र राजकीय व्यस्ततेमुळे त्यांना पती निलेश यांच्यासोबत लग्नाचा वाढदिवस साजरा करता आला नाही. मात्रा त्यांनी फेसबुक पेजवर पती निलेश यांच्याविषयी एक अतिशय प्रेमपुर्ण भावनीक पोस्ट केली. ती पोस्ट जशीच्या तशी पुढील प्रमाणे”
“निलेशजी,काल आपल्यासोबत सप्तपदीच्या सात फेऱ्या घेऊन चाकणकर कुटुंबांत गृहप्रवेश केला,याला 20वर्षे पूर्ण झाली.
वर्ष सरत गेली,आयुष्याच्या कडू-गोड आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन सहचारिणी म्हणून प्रवास करीत राहिले.
अनेक नात्यांची वीण गुंफत असताना, ती सगळीच नाती प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला, कारण निलेशजी, आपण लग्नात वचनच घेतले होते, माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबांतील सदस्यांना जास्त सांभाळ, बहीण, आई, वडील ही माणसे म्हणजेच मी आहे. ते वचन जपण्याचा प्रयत्न केला.
आज नाना-नानी नाहीत, पण एकत्र कुटुंबांत राहून एक राहिलो, माहेरापेक्षा काकणभर जास्त सासरची माणसे जपली आणि म्हणूनच कदाचित आजपर्यंतचा विश्वास संपादन करू शकले
काल अनेकांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, मी दौऱ्यात असल्याने आश्चर्यही व्यक्त केले, काल आपण बरोबर नाही तरीही मला मनापासून समाधान वाटले, पती म्हणून आपण दिलेली साथ ही माझ्या या राजकारणातील यशासाठी लाखमोलाची आहे. तुमच्या विश्वास आणि पाठबळावर हा प्रवास करताना संघर्षाला धार मिळते.
आपली माणसे बरोबर असली की, संकटांशी सहजासहजी लढता येते.
म्हणून वाढदिवस एक दिवसाचा जरी असला तरी वर्षभर आपण देत असलेली जोतिबाची साथ माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील तिजोरीतील ठेवा आहे.
हा एक दिवस सोबत नसल्याची खंत जरूर आहे; पण एकविचारांची सोबत कायमच सावलीसाखी वावरतेय त्यामुळे आपण दूर आहोत हे क्षणभरही वाटले नाही.
शरीराने फक्त बरोबर असण्यापेक्षा मनाने एक आहोत, याच शुभेच्छा!!” –
– तुमचीच रुपाली चाकणकर