‘मराठा आरक्षण’ हा राजकीय विषय नाही, समाजाचे नुकसान होऊ नये, हीच प्रामाणिक भावना!
मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली माहिती
मुंबई : “मला कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करायचे नाही. मराठा आरक्षण हा राजकीय विषय असू शकत नाही. फ़डणवीस सरकारने घेतलेले मुद्देच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. मराठा समाजाचे नुकसान होऊ नये हीच, माझी प्रामाणिक भावना आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती दिली. “मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक होती. या बैठकीत गेल्या 10-12 दिवसांतील उच्च न्यायालयाचे निर्णय आले आहेत. त्यावर चर्चा झाली. ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी या दोघांपैकी एक काहीतरी घ्या, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यातील सारांश तरी तेच सांगत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचे निर्णय, ईडब्ल्यूएस बद्दलच्या मागण्या आणि उर्वरित काही मागण्या याबाबत चर्चा झाली,” असे अशोक चव्हाण म्हणाले. “आज खासदार संभाजीराजेही भेटणार आहेत. त्यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल. हा विषय न्यायालयात जाऊन सुटणार आहे, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र आता ते जी भूमिका घेत आहेत, ती फार वेगळी आहे.” “ सर्वोच्च न्यायालयात चार वेळा लेखी दिले आहे. कोरोनामुळे न्यायालयाची सुनावणीही व्हिडीओद्वारे होतं आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी घटनात्मक खंडपीठ स्थापन होत नाही. तोपर्यंत याला चालना मिळणार नाही. यासाठी सरकारी वकील, सरकार मदत करत आहेत,” असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.