‘महाज्योती’चा ओबीसी, भटक्या जमातीसाठी मेगा प्लान, आतापर्यंत 50 कोटी…
ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना नीट आणि जेईई प्रशिक्षण : विजय वडेट्टीवार
नागपूर : ओबीसी आणि भटक्या समाजाच्या 10 हजार मुलांना नीट आणि जेईई परीक्षेचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.ओबीसी, भटक्या जमातीसाठी महाज्योतीनं मेगा प्लान आखला असून, महाज्योती संस्थेला आतापर्यंत 50 कोटी मिळाले आहेत. तर 150 कोटी प्रस्तावित असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
पोलिस प्रशिक्षणासाठी ‘महाज्योती’ लवकरच जाहिरात काढणार असून, प्रशिक्षणासाठी गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी 300 विद्यार्थी निवडणार असून, एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी 500 विद्यार्थ्यांची निवड गेली जाणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा, अशी मागणी मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठेपर्यंत नोकरभरती करू नका, अशी विनंतीही मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकरभरती सुरु करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. ओबीसींसह इतर मुलांचे वय वाढत चालले आहे, त्यांना वेठीस धरायला नको, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.‘मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतो आहे. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको’, अशा भावनाही विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी प्रतिक्रियेत संतप्त भावना व्यक्त केल्या. मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने संवेदनशीलपणे लक्ष घालण्याची गरज आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांचा प्रश्न आहे. यासोबत ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांचाही प्रश्न आहे. ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर नोकरभरतीत अन्याय होता कामा नये, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण वगळता ओबीसीच्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नाबाबत मधला मार्ग काढण्याची गरज आहे, असे दरेकर यांनी म्हणाले.