राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन?; उपमुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
राज्यात दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने..
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती, यवतमाळ, अकोला या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी राज्यातील करोना परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. राज्यात गेले काही दिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेत इतर जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग अधिक फैलावत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: ग्रामीण भागात करोना रुग्णवाढ दिसून येत आहे. त्यावर बोट ठेवत अजित पवार यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. ‘कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ या शहरात लॉकडाऊन लावायचा विचार आहे. मुंबईपेक्षा जास्त रुग्णसंख्या अमरावतीत दिसतेय. अमरावती विभागात जास्त रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहोत. अकोला, यवतमाळ आणि अमरावतीत सध्या काय परिस्थिती आहे, याबाबत आज आढावा बैठक होणार आहे. या बैठकीनंतर या तीन जिल्ह्यांत काय निर्णय घेणार हे समोर येईल,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, ‘लॉकडाऊनबाबत अकोला, अमरावती आणि यवतमाळच्या पालकमंत्र्यांशी माझे बोलणे झाले,’ असेही त्यांनी नमूद केले आहे.