शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे स्वप्न पूर्ण करू : हसन मुश्रीफ
ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची निगवे खालसा गावाला भेट, वाहिली आदरांजली
कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी निगवे खालसा ता करवीर येथील शहीद जवान संग्राम पाटील यांच्या घराचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करू, असे आश्वासन देत आदरांजली वाहिली. मुश्रीफ यांनी काल निगवे खालसा गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद संग्राम पाटील यांची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची आहे. त्यांच्या मागे आई- वडील , पत्नी व लहान मुले असा परिवार आहे. या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती आणि हीम्मत परमेश्वराने पाटील कुटुंबीयांना द्यावी, अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो असं ते म्हणाले. या परिवाराच्या पाठीशी हिमालयासारखे उभारणे, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. कुटुंबीयांच्या व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील स्वीकारतीलच. परंतु; मी आज वर्तमानपत्रात वाचले की शहीद जवान संग्राम पाटील यांचे घर बांधायचे स्वप्न अपुरे राहिले आहे. त्यांचे हे अपुले स्वप्न मी फाऊंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करेन असे आश्वासन देखील त्यांनी दिले. सोमवारी सकाळी अलोट गर्दीत होणारा अंत्यसंस्काराला सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी संयम पाळून अखेरची मानवंदना द्यावी, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले. गोरगरीब शेतकरी कुटुंबातील मुले परिस्थितीशी झगडत भारतीय सैन्यदलात भरती होत असतात. भारतमातेच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून ऊन, वारा, पाऊस आणि शत्रू अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी ते दररोज झगडत असतात. जवान शहीद झाल्यानंतर थोडेच दिवस समाज त्यांना सहानुभूती दाखवतो. काळाच्या ओघात पुढे विसरून जातो व ही कुटुंबे उघड्यावर पडतात. असे होता कामा नये . या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सदैव हिमालयासारखे राहिले पाहिजे असं ते म्हणाले.