‘…जर हा निर्णय झाला तर आंदोलन करू’; अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केल्याचा अण्णा हजारेंचा आरोप
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप अण्णा हजारे यांनी पत्रात केला आहे. जर हा निर्णय झाला तर आंदोलन करू, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. तसेच ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करून घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली आहे, असे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. हा निर्णय घेणाऱ्या मंत्र्याचा गृहपाठ कच्चा राहिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्याचबरोबर राज्यात पक्षाची, पक्षाने, पक्ष सहभागातून चालवलेली शाही येऊन लोकशाही पायदळी तुडवली जाणार, असे मत अण्णांनी व्यक्त केले. घटनेत पक्ष पार्टीचा उल्लेख कुठेही नसून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना देऊन पक्ष पार्टीच्या माणसांचा हस्तक्षेप होणे बेकायदेशीर आहे हे नाकारता येत नाही, असे मत अण्णा हजारेंनी व्यक्त केले.