स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचा विचार आहे का? : संदीप देशपांडे
हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारं, प्रत्यक्षात काहीच करत नाही, अशी बोचरी टीका
मुंबई : हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारे आहे, प्रत्यक्षात काहीच करत नाही, अशी टीका देशपांडेंनी केली. स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचे, असा ठाकरे सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न पडत असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले.‘तुम्ही रेस्टॉरंट-बार सुरू करत आहे. एक-एक आस्थापना सुरू करता, पण त्यासाठी लोकांनी कामावर कसे जायचे? त्या प्रश्नाचे उत्तर सरकार देत नाही.
‘नुसती घोषणा करता, 15 ऑक्टोबरपासून लोकल सेवा सुरू करण्यासाठी विचाराधीन आहोत. त्यासाठी विचार करावा लागतो. विचार करण्याचे धाडस सरकरमध्ये नाही’ अशी टीका त्यांनी केली. 15 ऑक्टोबरपासून लोकल सुरू करण्याचा विचार असल्याचे मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते. ‘उच्च न्यायालयाने कान टोचले तरी यांना बुद्धीला सुचत नाही. स्वतः घरी बसले म्हणून लोकांना घरी बसवायचे, असा ठाकरे सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न पडतो’ . सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु करण्याचा विचार करा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. ’10- 15 दिवस झाले आम्ही सातत्याने मागणी करत आहोत, बँक रोज कर्जासाठी तगादा लावत आहे, लोक कामावर गेले नाहीत, तर कसे भरणार हे पैसे?’ असा सवालही संदीप देशपांडे यांनी केला. ज्या कॅटेगरी सुरु केल्या, त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना तरी परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी केली. ‘नागरिक आता याचे उत्तर देतील. आंदोलन करुन जर सरकारला शहाणपण येत नसेल आणि सरकारला डोके नसेल तर आपण तरी काय करणार? हे सरकार फक्त फेसबुकवर घोषणा करणारे आहे, प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही’ असे संदीप देशपांडे म्हणाले.