मराठवाड्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी
ओला दुष्काळ जाहीर करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
औरंगाबाद : मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रशांत बंब यांनी या पत्राद्वारे केली आहे. तसेच नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन बळीराजाला दिलासा द्यावा, असेही बंब यांनी पत्रात नमूद केले .
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले की, कित्येक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाच्या लहरीपणाशी लढा द्यावा लागत आहे. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने अपेक्षेप्रमाणे उत्पन्न येईल, असे वाटत होते. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात तसेच मराठवाड्यात सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने गंगापूर-खुलताबाद मतदारसंघासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन बळीराजाला दिलासा द्यावा,” अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे..