वडीगोद्री परिसरात ढगफुटी, ‘मांगणी’ला महापूर, पिके उद्ध्वस्त
दोन फुटांपर्यंत पिकांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत
जालना : जालन्यातील अंबड मधील वडीगोद्री भागांत काल रात्री ढगफुटी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली. मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व नदी नाल्यांना महापूर आला असून गेल्या २५ वर्षांतील हा सर्वात मोठा पाऊस असल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. वडीगोद्रीतील मांगणी नदीच्या पात्राबाहेर अर्धा किलोमीटर पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शिरले आहे.
या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, बाजरी, कपाशी, तूर आणि ऊस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत सापडला. १७० मिलिमीटर झालेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.अंबड तालुक्यातील गल्हाटी नदीलादेखील पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आाहे. वडीगोद्री मंडळात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या २०३ टक्के पाऊस झाला आहे.परिणामी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली. ३०-३५ वर्षात असा पाऊस आम्ही पाहिलेला नाही.नुकसान खूप झालेलं आहे याची शासनाने दखल घ्यावी. ऊस, कपाशी आणि सर्वच पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. शेतकरी काळजीत सापडल्याचे शेतकरी लक्ष्मण मिसाळ यांनी सांगितले. नुकसान खूप झाले आहे. पीकविमा भरूनही याआधी नुकसान भरपाई मिळाली नाही. या पावसामुळे बाजरी, तूर, कपाशी आणि ऊस पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे शेतकरी छगन घुले यांनी सांगितले. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिला.