अजित पवारांनी ठणकावले, नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न…
औरंगाबाद नामांतरावरुन राज्यात राजकीय वातावरण निघाले ढवळून
पुणे : नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते. औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. नामांतर झालेच पाहिजे, अशी भूमिका सेनेने घेतली तर काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केला. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असे म्हटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला.
राज्यात नामांतराशिवाय कोरोना, लसीकरण यावर काम होणे गरजेचे
राज्यात औरंगाबादच्या नामांतरावरुन चांगलाच गोंधळ सुरू आहे. यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल. या व्यतिरिक्त राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून सोडवतील, असे म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली. राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतायत. मात्र पुढचे काही पक्षप्रवेश होताना प्रवक्ते हे माध्यमाला सांगतील. त्यामुळे तो काही मोठा प्रश्न नाही, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पुढच्या काळात पक्षप्रवेश होतील, असे सूचकपणे अजित पवार यांनी सांगितले.
मेहबूब शेख यांच्यावरील आरोपात तथ्य नाही
राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर होत असलेल्या आरोपाचे अजित पवारांनी खंडन केले. मेहबूबवर झालेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. पोलिस तपासात योग्य माहिती समोर येईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत नाहीत. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
महापालिका स्वतंत्र संस्था, तिला निर्णय घेण्याचा अधिकार
पुणे महापालिकेत या आधी जी 11 गावे समाविष्ट झाले, त्यामध्ये मिळणाऱ्या मिळकत करात झेडपी सीईओंनी सवलत दिली. त्याविरोधात महापालिका न्यायालयात जाणार आहे. यावर अजित पवार म्हणाले, “पालिका स्वतंत्र संस्था आहे, ती निर्णय घेऊ शकते, मात्र जर यामध्ये कोणावर अन्याय होत असेल तर नगरविकास खात्याकडे तक्रार करता येते, मात्र जर शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना टॅक्स भरावाच लागेल, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.