सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्यांना ५ वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.
लालू यादव यांच्यासह बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोघांनाही ५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणाचा युक्तीवाद १९ जानेवारीलाच पूर्ण झाला होता. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.
या प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही कोर्टाने दोषी ठरवले आहे. त्यांनाही ५ वर्षांची शिक्षा सुनावली असून सीबीआय आर्थिक गुन्हे शाखेनुसार, ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळा संबंधी चाईबासा कोषागारातून ३५ कोटी ६२ लाख रूपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवले आहे.
देवघर कोषागार प्रकरणासाठी लालू यादव आधीच साडेतीन वर्षांचा कारावास भोगत आहेत. लालू यादव रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. लालू यादव यांना गेल्या ६ जानेवारीला सीबीआयच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती.
काय आहे चारा घोटाळा ?
चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधे आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला होता. या चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली होती.